शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
नागपूर, 21 डिसेंबर: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणाही विधासभेत करण्यात आली. 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी असेल. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. त्यांना अधिकाधिक, लवकर आणि योजनेचा सर्व फायदा मिळेल याची काळजी सरकार घेईल. तर 30 सप्टेंबर 2019 पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू होणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीला महात्मा फुले कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली, ती परिपूर्ण नाही. सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. तो पाळलेला नाही, असं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधारी पक्षांनी मात्र या योजनेचं स्वागत केलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा दावा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा